औरंगाबाद : नुकताच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले असले तरी कालपासून आकाशात ढगांची गर्दी दिसून येते. उन्हाचा तडाखा कमी झाला असला तरी उष्णता मात्र फारशी कमी झालेली नाही. त्यामुळे येत्या २४ तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दिन दिवसात जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, सोयगाव आणि वैजापूर या चार तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ३.३० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत ४९ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, आतापर्यंत केवळ ९.६ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील उस्मानपुरा मंडळात ३० मिमी तर कांचनवाडी मंडळात १ मिमी पाऊस झाला. पैठण तालुक्यातील पिंपळगाव परिसरात २ मिमी आणि बालानगर परिसरात ८ मिमी पाऊस झाला आहे. वैजापूर शहरात ११, त्याचबरोबर खंडाळा ५ आणि लासुरगाव परिसरात ३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६७५ मिमी एवढी आहे. ९ जून पर्यंत ३८ मिमी पावसाची अपेक्षित सरासरी होती. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ९.६ मिनीच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत ९.२२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्याचा विचार करता गेल्या वर्षी आजपर्यंत १५ मिमी पाऊस झाला होता. या वर्षी मात्र फक्त १.६८ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे.